Thursday, November 19, 2009

मी आणि राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस)

'समाज सेवा ब्रीद आमुचे, स्वार्थ सुखाची आस नसे,
थोर कारणी देह वहावा, एक मात्र हा ध्यास असे'

अनेकांच्या जीवनात अनेक आठवणी व क्षण येतात. तसेच माझे जीवन घडत गेले. मी एक अतिशय गरीब घराण्यातला मुलगा आहे. गरीबीतून माझे प्राथमिक शिक्षण पहिली ते दहावीपर्यंत आश्रमशाळेमध्ये राहून पूर्ण केले व नंतर जव्हार या तालुक्याच्या ठिकाणी 11वी कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून मी मनात ठरवलं होतं की कोणाचातरी आदर्श घेऊन पुढे गेले पाहिजे व तेव्हापासून मी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वावरत होतो. अशाच परीस्थितीत मी 11वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण घेत असताना वरीष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) या युनिट मार्फत अनेक मुले विविध कार्यक्रमांचे आयोजन करित होते व त्या मार्फत ते वृक्षारोपण, पोलियो शिबिरं, रक्तदान शिबिरं अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत होती. त्यांना बघून मला सुद्धा मनात की मी त्यामध्ये सहभागी व्हावं व मी संबंधित कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल पाटील व प्रज्ञा कुलकर्णी यांना भेटलो व त्यांनी मला सहभागी करून घेतले.

मी जेव्हा एन. एस. एस. मध्ये प्रवेश घेतला तेव्हा मला असं वाटलं होतं की फक्त लोकांची सेवा करणे हाच उद्देश असे, परंतू यामध्ये लोकांची सेवा करता करता आपला स्वत:चा व्यक्तीमत्त्व विकासही घडवू शकतो हे शिकलो. मी प्रथम वर्षामध्ये मुलांबरोबर काम करित होतो व त्यामध्ये वनराई बंधारे, पोलिओ डोस पाजणे, सर्वेक्षण करणे यासारखी कामं करित होतो. हे करत असताना ती मनापासून करावी लागत होती आणि हे सर्व काम बघण्यासाठी कामावर नियंत्रण ठेवणारे कार्यक्रम अधिकारी यांनी मला निवडून काढले व त्यांनी विचारले की तू या शिबिराचे प्रतिनिधित्त्व करू शकशील का? मी होकार दर्शविला व तेव्हा पासून मी महाविद्यालयातील रासेयो प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली.

आज मी एन. एस. एस ची एकूण विद्यापीठ व राज्यस्तरीय पाच शिबिरे केलेली आहेत. या प्रत्येक शिबिरामध्ये मला वेगळे शिकण्याची संधी मिळाली आहे व अनेक शहरी विद्यार्थ्यांबरोबर संपर्क जोडला गेला व त्यांचे राहणीमन, बोलीभाषा, वेशभूषा बघून मी सुद्धा त्यांच्यासारखा माझ्या स्वत:त बदल करून घेतला. तसेच मी ग्रामीण खेड्यातला मुलगा असून सुद्धा त्यांनी मला सांभाळून घेतलं कारण एन. एस. एस ही यंत्रणा सर्व महाविद्यालयात एकत्र येवून काम करत असते. त्यामध्ये कुठलाही धर्म, जातीभेद केला जात नाही व राष्ट्रीय एकात्मता यातून सिद्ध होते.

आजपर्यंत आमच्या महाविद्यालयाचे तीन शिबिरांचे नियोजन करण्याची जबाबदारी मला सतत दोन वर्ष मिळाली आहे. यातून मला अनेक विद्यार्थ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली व सर्व स्वयंसेवकांनी मला सहकार्य केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये श्रमदानाबरोबर व्यक्तीमत्त्व विकास कसा करता येईल यासाठी अनेक मार्गादर्शक लाभले.

अनेक पथनाट्य, संगीत करमणुकीचे साधन म्हणून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाते व त्यातून ग्रामीण भागातील लोकांना व्यसनमुक्ती, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन या सारखे संदेश दिले जातात. राज्यस्तरीय शिबिरामध्ये आमच्या गटाने पथनाट्य स्पर्धेमध्ये हगणदारी मुक्त गाव या विषयावरती प्रथम क्रमांक मिळविला.

पूर्वी मी काम करत असताना आत्मविश्वास नव्हता परंतू आता मी नक्कीच काम करू शकतो. आमच्या महाविद्यालयामध्ये एखादा कार्यक्रम ठरला तरी तो मी यशस्वीपणे कसा पार पाडायचा याचे नियोजन करण्याचे संपूर्ण कौशल्य माझ्या अंगी आहे. त्याचा अर्धा वाटा हा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल पाटील व प्रज्ञा कुलकर्णी व माझे प्राचार्य व सर्व प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवक यांचा आहे.

रासेयो या नावात सर्व काही आहे. Not me, but you! म्हणजेच जे काही करू ते आधी समाजासाठी, देशासाठी, मग माझ्यासाठी हे माझ्या हृदयात कोरून ठेवले आहे आणि त्याचा मी नक्कीच माझ्या जीवनात राष्ट्रातील सर्व लोकांसाठी करेन, तसेच समाजातील महिलांच्या समस्या समाजात आज चाललेला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्याचा मी पुरेपूर वापर करेन, व असा निर्धार प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न करेन.

ज्यास गायचे जीवन गाणे। त्यास आभाळ मोकळे ॥
ज्यात नाही रक्त सळसळत। ते तारुण्य पोकळे ॥

वरील वाक्यातून असे सिद्ध होते की विद्यार्थ्यांना मिळालेल्या संधीचे सोने करायचे ठरवले तर करण्यासारखे खूप आहे. ही संधी आज मला रासयो ने उपलब्ध करून दिली आहे. मला जेवढं शक्य होतं तेवढा वेळ मी स्वयंसेवक म्हणून काम केलं. यातून मला पुढे वसतीगृहा मध्ये प्रतिनिधी म्हणून नियोजन करण्याची संधी मिळाली व त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांबरोबर काम केले. विद्यार्थ्यांमध्ये अनेक चांगले गूण असतात. परंतू त्यांना मार्गदर्शन करणारे कोणी नसते. म्हणून रासयो अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

आज रासयोचे अनेक अविस्मरणीय क्षण माझ्या जीवनात घडले आहेत. ते सतत माझ्या स्मृतीत असतात व त्यातून समाजासाठी काम करत असताना ते काम तन मन धन अर्पण करून करित असतो. हाच माझ्या यशाचा खूप मोठा वाटा आहे. आज रासयो ने मला जे व्यसपीठ उपलब्ध करून दिले आहे त्याचा उपयोग पुढील आयुष्यात होईल 

एक विचार समतेचा, उद्याच्या भवितव्याचा
अंधारातून प्रकाशाचा मार्ग, समाजाच्या उत्कर्षाचा।  

-मनोज कामडी
जव्हार महाविद्यालय

Wednesday, November 18, 2009

स्वातंत्र्य तुमच्या बापाचे आहे का?

स्वातंत्र्याच्या 63 व्या वर्षात सर्वसामान्य जनता खरंच स्वतंत्र आहे का? अस्वस्थ झालेली भिरभिरत्या नजरेची अनेक तरूण मुले, कसे बसे उरलेले आयुष्याचे दिवस काढत राहिलेले वयोवृद्ध मुलाबाळांना जन्म देऊन त्यांचे संगोपन व जगण्याची व्यवस्था करण्यासाठी बिर्हा ड बांधून इतरत्र कामावर जाणारा मजूर, काखेत हिरो बॅग घालून जाणारा रेतीवाला कामगार यांच्या संपूर्ण आयुष्यात स्वातंत्र्य आहे का? पशु पक्ष्यांनी पिलांना जन्म द्यावा त्याप्रमाणे मुलांना जन्म देऊन बायकोला त्यांचा सांभाळ करण्यासाठी गावात ठेवायचे व घरातील सर्वांना दोन वेळेचे कसे बसे अन्न मिळावे म्हणून कर्त्या पुरुषाने इतरत्र मिळेल तिकडे दिवसेंदिवस बाहेर मोलमजूरी करावयाची हेच का ते स्वातंत्र्य?

स्वतंत्र भारताच्या पूर्वर्धापासून आजपर्यंत अनेक विकासाच्या योजनांचे कागदी घोडे कधी संसदेत कर कधी विधान सभेत नाचविले, कधी दिल्लीत तर कधी मुंबईत विकासाच्या मोठमोठ्या योजना कागदावर उतरविल्या. आजच्या परीस्थितीत अण्णांच्या कठोर प्रयत्नांनी, आबा सारख्या कर्त्या पुरुषाच्या पुढाकारानी दिल्लीतील विकास योजना गल्लीत आल्या (ग्रामपंचायत) पण त्या फक्त कागदावर. विषेश म्हणजे आदिवासींचे अर्थात सर्वांच्या विकासासाठी दिल्लीपासून गल्ली पर्यंत शासकीय नोकरांची व पदाधिकार्यांआची कार्यपद्धती अमलात आहे. त्याप्रमाणे कागदावरील कारभार रक्तरंजित करून रंगवून सरकारच्या जाहिरनाम्याप्रमाणे फाइली भरल्या आहेत. परंतु गोदामात साठवून ठेवलेल्या धान्याचा उपयोग काय? ते धान्य वाटून देणार्याप एका प्रेमळ बापाची गरज असते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक नवे तर दोन बापांची कार्यपद्धती विकसित आहे. आमचे मात्र दुर्दैव आहे की जन्म देणार्याक बापाला अक्कल कमी तर सावत्र बापाची माया कमी. आज आदिवासी विकासासाठी स्वतंत्र विभाग, खाती, स्वतंत्र मंत्री, सचिवालय आहेत. वेगवेगळ्या कार्यालयात वेगवेगळे आदिवासी विकासाच्या योजना आहेत. पण स्वातंत्र्याच्या 63 व्या वर्षानंतर सुद्धा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो, ‘स्वातंत्र्य कुणाच्या बापाचे?’ एखादी विकासाची योजना वैयक्तित, सामाजिक घ्यावयाची असेल, तर पदाधिकार्यांतच्यी, शासकीय अधिकार्यावची शिफारस तसेच योजना एक कागदे अनेक या विविधतेत दुसरी भर म्हणजे आमच्या आदिवासी समाजात प्रत्येक सणाला मावली, चेडा, वाघ्यादेव, गावदेव, बारस यांना सगळ्यांना टिळे द्यावे लावतात. किंबहुना प्रत्येक पोळ्याला सर्व देवांना चौरे बांधावी लागतात. तसेच प्रत्येक टेबलावरील देवाला नमस्कार, चमत्कार, रामराम घालून पुंजावे लागते. त्याला पर्याय नाही. विषेश म्हणजे साधे अर्ज घेण्यासाठी टाळाटाळ करून कायदे अटी दाखवणारे पैशे दिल्यानंतर काम करतात. तेव्हा प्रश्न निर्माण होतो... ‘स्वातंत्र तुमच्या बापाचे आहे का?’


वास्तविक कायद्याप्रमाणे खुर्चीवर विराजमान होणारे पदाधिकारी जनतेचे सेवक आहेत. दुसर्‍या खुर्चीवर बसणारे शासकीय कर्मचारी जनतेचे नोकर आहेत (दोन बाप). परंतु स्वातंत्र्याच्या 63 वर्षानंतर सुद्धा पुढा-‍यांची (सेवकांची) हुकुमशाही, नोकरांची ब्रिटिशशाही या विकासाच्या आड येणार्यार सर्वात मोठी न उलगडणारी समस्या समाजात पाय रोवून उभी आहे. म्हणून या समस्यांना उत्तेजन देणार्याम महाभागांना माझा प्रश्न ‘लोकशाहीच्या राज्यात मिळालेले स्वातंत्र्य तुमच्या बापाचे आहे का?’ मनात मानत असाल ‘हो’ तर ती घोड चूक करू नका. कारण कवी गोविंद यांच्या

रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना
असा भूतकाळीन सिद्धांत जाणा
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले
रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?

 
या ओळी अत्यंत समर्पक आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रयत्नात अनेक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. क्रांतीच्या वेशीवर आपली शरीरे समिधा म्हणून अर्पण केली. या सर्वांची आठवण न ठेवणे म्हणजे कृतघ्नता होय. धर्म शास्त्रात सर्व प्रकारच्या पापांना प्रायश्चित आहे. तथापी कृतघ्नता या महात्पापाला मात्र कोणतेही प्रायश्चित नाही. असो.

परंतु आता मात्र बाप हुशार झालेत त्यांनी चारून बघितले व आपल्याला मोठे केले. आता म्हणतात तुम्हीच खा आम्ही वाढून दिले आहे. आता किती खायचे ते तुम्ही ठरवा. म्हणजेच शासनाने योजनांचे कायद्यात रुपांतर करून ते आपल्या हातात दिले आहेत.


1. रोजगार हमी योजना –> राष्ट्रिय ग्रामिण रोजगार हमी अधिनियम 2005 अंतर्गत
2. अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम 2006 आणि नियम 2008
3. रोमाहितीचा अधिकार अधिनियम 2005

कायदे झाले म्हणजे विकास दारात आला या भ्रमात राहू नका. कारण जसे स्वातंत्र्य म्हणजे एकदा घडणारी घटना नव्हे, नेत्यांच्या जयंत्या बयंत्या होतात तशी स्वातंत्र्याची ही एक जयंती केली की स्वातंत्र्य टिकते असे नाही. स्वातंत्र्य हे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जसे देहातले चैयन्य असते. मिळाले एकदाचे स्वातंत्र्य असे म्हणून जांभई देता येत नाही. राज्याभिषेक झाला म्हणून शिवरायांनी तलवार म्यान केली असती तर स्वराज्य केव्हाच बुडाले असते. मावळे जागते होते म्हणून स्वातंत्र्य टिकले. आता आम्ही शिवजयंती ला मावळ्यांची सोंगे आणतो पण स्वातंत्र्याची जागते म्हणून स्वातंत्र्याचा बाणा काही आम्ही जगत नाही. मुर्दाडासारखे बसून आम्ही स्वातंत्र्य हरपताना बघतो. छ्त्रपालापासून भगतसिंघापर्यंत अनेकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा शिवाजी महाराजांकडून घेतली. पण आम्ही येथे शिवरायांच्या भूमित जन्मूनही स्वातंत्र्याची राखण करायला उठत नाही. त्याचप्रमाणे कायद्याची अम्मलबजावणी करण्यासाठी आपण थोडेफार कष्ट करण्याची आवश्यकता आहे. जसे स्वातंत्र्यासाठी तंट्या भिल, बिरसामुंडा, नाग्या कातकरी अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा व स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या क्रांतीविरांनी प्राणांची आहुती देऊनच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. विषेश म्हणजे इंग्लंडच्या भूमीवर एका गोर्याआचे रक्त सांडण्याचा भीष्म पराक्रम मदनलाल धिंग्राने केला. तेव्हा क्रांतीवीरही हिंदुस्तानातच नव्हे तर थेट ब्रिटन मध्ये येऊन एका गोर्यााला लोळवतात हे क्रांतीवीरानी केलेले प्रेरेणादायी सत्य आहे. म्हणून या स्वातंत्र्यात आपण आपल्याबरोबर समाजाचा विकास करण्यासाठी अस्तित्त्वात अलेल्या कायद्यांची अम्मलबजावणी करण्यासाठी सामाजिक बांधिलकीने सहभागी व्हा. मी म्हणणार नाही क्रांतीकारक व्हा, प्राणांची आहुती द्या परंतु एक मात्र नक्की... आपण कुठेतरी दूरवरचे नाव ऐकतो अण्णा हजारे, पोपोटराव पवार, चैतराम पवार यासारखे कर्तव्यबहाद्दुर समाजसेवक मात्र निश्चित होऊ शकतो. तेव्हाच आपणाला कोणी विचारेल ‘स्वातंत्र्य तुझ्या बापाचे आहे का?’ तर मग तयार व्हा ‘हो’ म्हणायला. शिका कायदे आणि म्हणा ‘हो, स्वातंत्र्य आमच्या बापाचे आहे’

-विनायक थाळकर

अस्वस्थ युवांचे मन

अस्वस्थ झालेली भिरभिरतेच्या नजरेची अनेक तरूण मुले इतरत्र बेकार फिरतात. त्यांना त्यांच्या जगण्याचा अर्थ शोधावयाचा असतो. काहीतरी वेगळे करावे, चार चौघांपेक्षा निराळे जगावे असे वाटत असते. अनेकांच्या मनात देशासाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक उर्मी असते. प्रश्न असतो 'फक्त आम्ही काय करू?' या प्रश्नाला एकच एक उत्तर असे नाही. जे करावेसे वाटते त्याला कडाडून भिडणे आणि ते करून पहाणे, हाच त्यावरचा उपाय आहे. असे करून पाहिले की तुमचे तुम्हालाच कळेल की खरेच मला हे करावयाचे होते का? त्यासाठी आवश्यक क्षमता माझ्यात आहे का? त्यासाठीची किंमत आपल्याला देता येते का? हाच माझा मार्ग आहे का? तुमच्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा तोच मार्ग आहे.

-विनायक थाळकर

Tuesday, November 17, 2009

युवा क्रांती

आम्ही ठाणे जिल्ह्यातील, जव्हार तालुक्यातील आदिवासी युवा. गोखले एजुकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातून बीए पर्यंत शिकलो आहोत. आपल्या समाजासाठी युवांना एकत्र घेऊन पुढे काम करण्याची आमची तीव्र इच्छा आहे. आम्ही कसे घडलो इथपासून ते कार्य करत असताना येणारे अनुभव जगासमोर मांडत आहोत!!